Wednesday, November 3, 2010

आठवणीतली दिवाळी

शाळेत असताना १८५७ च्या उठावाची कारणे आणि भुमितीची प्रमेय घोकत असताना नाकात येणारा खमंग चकलीचा वास दिवाळीची चाहुल द्यायचा. मग कधी एकदाची सहामाही संपते अन कधी फटाके घेतो अस व्हायचं. शेवटच्या पेपरला मग आईच्या ‘कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर लिहिले?’ या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन गल्लीतल्या पोरांबरोबर चौकात धुम ठोकायचो. कोण किती फटाके उडवणार, कोणाकडे कुठल्या आकराचा आकाशकंदिल असणार हि दिवाळीपुर्वीची तयारी करण्यात मग मनं हरपुन जायचं.

नरकचतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे घरातील मोठी मंडळी पोरांच्या अंगावरील गोधड्या काढून टाकत. थंडी अंगाला झोंबु लागली की कधी एकदाचा गरम पाणी अंगावर घेतो असं होई. पण आधी मोठ्या मंडळींचा आंघोळीचा राऊंड होई, तोपर्यंत आम्ही पहिल्या आंघोळीचे फटाके उडवत असू. बाहेरच्या मिट्ट काळोखात चुल किंवा बंबातले लाल निखारे बघत दात घासताना, गावातल्या सांस्क्रुतिक मंडळाने लावलेली भजनं अन् प्रभात गीते मनात चैतन्य निर्माण करी. आमच्या आंघोळी सुरु होईपर्यंत सगळं घर सुगंधी तेल व उटण्याच्या वासने दरवळुन जाई. मग आई, ताई, आजीच्या थंड हाताने तेल-उटणे लावताना अंग अजुनच कुडकुडून जाई. आंघोळ आटोपल्यावर मग फराळाचे वेध लागत. एकदा का फराळ फस्त केला की मग आम्ही बच्चे मंडळी हुंदडायला मोकळी. मग संध्याकाळी नवीन कपडे घालुन आम्ही आजोबांकडुन आपआपल्या वाटेची फटाके घेत असु. ‘फटाके अंगापासुन दुर ठेवा’, 'गायींपासुन दुर फटाके फोडा रे…’ या सुचनांसहित फटाके वाटप होत असे.

मी झोपण्यापुर्वी एकदा गल्लीतल्या सर्व पणत्या अन आकाशकंदिल पुनःपुन्हा डोळ्यात अन् फटाक्यांचे आवाज कानात साठवुन घेत असे. आम्ही सगळी भावंड कडकडत्या थंडीत अंगावर गोधड्या ओढुन 'आता पुन्हा पुढच्या वर्षीच ही आनंदाची दिवाळी येणार' अशा विचारात झोपुन जात असु.

कित्येक वर्ष ही आठवणीतली ही दिवाळी मी मनात घट्ट पकडुन ठेवली आहे. पण पुर्वी दिवाळीत मिळणारा शेव-चिवडा हल्ली हल्दीरामच्या पॅकेट्सद्वारे लोकलच्या प्रवासातला टाईमपास झाला आहे. चकली-लाडु फुड-मॉलमधे बारमही मिळु लागले. वाढदिवसाला पंचपक्वान्न करणं देखील रीत झाली. लग्न-निवडणुकांच्या आतषबाजीने फटाके म्हणजे दिवाळी हे समीकरण बदलुन टाकलं. ऑफिसला जाण्यापुर्वी फसफसुन मारलेल्या पर्फ्युम्सनं सुगंधी तेलं-उटण्याचं नाविन्य कमी केलं. अन् ट्रेंडी कपड्यांच्या नियमीत शॉपिंगने दिवाळीच्या नव्या कपड्यांची नवलाई संपुष्टात आणली. कालाय तस्मै नम:!

जुनं काही बदललं म्हणुन ही तक्रार नाही. वेगानं बदलत असलेल्या या नव्या जगाचे नक्कीच स्वागत आहे. पण हे बदल होताना मुळचा उत्साह निखळपणा अन् निर्व्याज आनंददेखील संपुष्टात येतोय की काय याची चाहुल अस्वस्थ करते. त्यामुळे जसं जसं वय वाढत गेलं आणि घरापासुन दुर गेलो, तसतशी ती बालपणीची दिवाळी आठवणीत आणखी रुतत गेली. दिवाळीच्या वातावरणात घरापासुन दुर असलं की ती आठवणीतली दिवाळी जागी होते.

तुम्हा सर्वांना आपआपल्या आठवणीतल्या दिवाळीच्या मनापासुन शुभेच्छा

Tuesday, December 8, 2009

परुळेकरांची मुक्ताफळे

माझ्या सदर ब्लॉगपोस्टची पार्श्‍वभूमी जाणण्यासाठी लोकप्रभा मासिकच्या २७ नोव्हेंबरच्या अंकात राजू परुळेकर यांनी लिहिलेला हा लेख जरूर जरूर वाचा. लेख वाचण्यासाठी एथे क्‍लिक करा.

हा लेख वाचून राजू परुळेकरांना लिहिलेला ई-मेल इथे पोस्ट करत आहे.

नमस्कार,
नुकतीच तुमची २७ नोव्हेंबरच्या लोकप्रभेतील अल्केमिस्ट्री वाचनात आली. यात सचिनबद्दल कुठलाही द्वेष, तिरस्कार नसल्याचे जरी आपण म्हंटले असले तरी लेख वाचताना याची शंका येते. यातील काही ठळक मुद्दे मी या पत्राद्वारे मांडु इच्छितो.

प्रसारमाध्यमांनी सचिनच्या २० वर्षाच्या कारकिर्दीचा एवढा थाट का केला हे आपण पत्रकार असल्याने अत्यंत उत्तमपणे मांडले आहे. पण यापुढे जावुन आपण नुकत्याच सचिनवर महाराष्ट्रभर झालेल्या टिकेला प्रसारमाध्यम कशी जबाबदार आहेत हे लिहिणार अस वाटत असतानाच लेख अनपेक्षित वळण घेतो. अर्थात मी देखिल तुमच्यासारखाच क्रिकेटला धर्म आणि सचिनला देव मानणार्‍यातला नाही, पण तो श्रीमंत असल्याने जनता त्याला मानते असे साफ चुकीचे आहे. सचिनची खेळी पाहाताना तमाम जनता त्याच्या शैलीकडे डोळेझाक करुन त्याच्या संपत्तीला दाद देते हे अत्यंत हास्यास्पद विधान आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे सचिनबद्दल लिहिणारे आणि बोलणारे अनेक विचारवंत वैचारिक दिवाळखोर आहेत अस आपण म्हणलात. अस असेल तर लतादीदी, धीरूभाई, अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर देखील अनेकजनांनी लिखाण केले आहे. ते देखील दिवाळखोरच का? कारण या सर्वांनी देखील हिम्मतराव वाबिस्कर, अभय बंग आणि प्रकाश आमटे यांच्यासारखे उल्लेखनीय समाजकार्य केल्याचे कुणाच्याही स्मरणात नाही. सचिनने मानवजातीला कोणते वरदान दिले हे विचारणे म्हणजे विषय सोडून बोलणे झाले. या सर्वांची सचिनशी तुलना होऊच शकता नाही. कारण प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहे. जो तो आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ आहे. आणि थोड्याफार प्रमाणात का होईना सचिन देखील समाजकार्य करतो. सचिनच नव्हे तर अनेकजण आपापल्या परीने समाजकार्यात खारीचा वाटा उचलत असतो. ट्रॅफिक जॅम झालेल्या रस्त्यात हातातली काम सोडून हाफ पॅंट वर गाड्यांना रस्ता करून देणारा युवक आणि अंधाला रेल्वेचा पूल ओलांडून देणारा मुंबईकर आपण रोजच पाहतो.

इथे सचिनच्या प्रामाणिकपणे कर भरून कमावलेल्या श्रीमंती बद्दल केलेली चर्चा अनावश्यक वाटते. कारण सचिन काही इतरांसारखा सामान्य जनतेचे शोषण करुन श्रीमंत झालेल्यांपैकी नक्कीच नाही. सचिनने क्रिकेट आत्मसात करण्यासाठी घेतलेले कष्ट या लेखात सोयीस्करपणे दुर्लक्षित केले गेले आहेत. सचिनने स्वत:ने बोललेले एक वाक्य इथे नमूद करावेसे वाटते. "भेळपुरी खण्यापासून कैर्‍या तोडण्यापर्यंत सार्‍या आनंदावर पाणी सोडून आपली सारी इनर्जी क्रिकेट मधे ओतली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. आचरेकर सर मानगुटीवर बसून प्रॅक्टिस करायला लावायचे तेव्हा खूप वाईट वाटायाच. साधी भेळपुरी खाता येत नसेल तारा कसला अर्थ मोठा खेळाडू होण्यात अस वाटायच. पण आयुष्यात काहीतरी कमवण्यासाठी हजारो गोष्टी गमवाव्या लागतात."

आणि सचिनच्या कर्णधारपदाच्या अपयाशाची चर्चा जगभर कुठेच होत नसताना आपल्याच लेखात वाचायला मिळाली. स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद. कदाचित अख्ख्या क्रिकेतजगतातील विक्रम आपल्या नावावर केलेल्या सचिनला देखील याचे स्मरण नसणार. एक गोष्ट मात्र खरी, की उंटावरून शेळ्या हाकणार्‍या सेनापतीपेक्षा कधीही छातीवर वार झेलणारा बलाढ्य योध्दच श्रेष्ठ, नाही का?

गांगुली बंगाली प्रसारमाध्यमणशी जाणीवपूर्वक संवाद साधतो म्हणून सचिनने देखील मराठी मीडियाला जवळ का करावे? सचिन कधीही प्रसिद्धीच्या मागे लागला नाही. त्याने घरी कधी कुठली पत्रकार परिषद बोलावल्याचे मला तरी आठवत नाही, मराठीही नाही अन इंग्रजी पण नाही. स्वत:ला आणि त्याच्या कुटुंबाला तो नेहमी प्रसारमाध्यमंपासून दूर ठेवतो.

नुकतेच सचिन न बोललेल्या वाक्याला विनाकारण प्रसिद्धी दिली गेली. या लेखातुन तुम्हीसुद्धा याला हातभार लावलात. "तु महाराष्ट्रीयन असल्याबदद्ल काय फिल करतो?" या प्रश्नाला सचिनने "नक्कीच मला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे, पण मी प्रथम एक भारतीय आहे", एवढे आणि फक्त एवढेच उत्तर दिले होते, बाकी सगळा मीडिया मायलेजचा खेळ होता. मुंबईत कोणीही येऊ शकतो वगैरे तो कधीच बोलला नाही.

लता-दीदी सचिन यांसारखे यशाच्या उत्तुंग शिखर गाठण्याची क्षमता असलेले अनेकजण महाराष्ट्रात आहेत. फक्त एका मराठी माणसाची दुसर्‍या मराठी माणसाचे पाय खेचण्याची वृत्ती नडते आहे. मुंबई मराठी माणसांची आहे आणि ती रहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

ता. क.: आणि हो, तुमच्यादेखील २० वर्षाच्या कारकिर्दिला माझा सलाम. (अडव्हान्स मधे)

एक पामार वाचक,
सचिन अ. जोशी
मुंबई

Wednesday, November 11, 2009

गड गेला पण सिंह आला

परवाच्या मॅच मधे सचिन आऊट झाला अन करोडो चाहत्यांचा काळजचा ठोका चुकला. आपल्या कारकीर्दितली अजुन एक अविस्मरणीय खेळी करुन सचिनने आपले अस्तित्व तर दाखवुनच दिले पण टिकाकारांच्या कानाखाली जबर चपराक देखील दिली. अर्थात भारत तो सामना हरला आणि काल तर मालिका पण गमावली. गड गेला खरे, पण सिंह आला हे नक्की. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पण असेच काही घडले. एकीकडे मराठी माणुस युतीच्या हातुन सत्तेचा गड गेल्याची हळहळ व्यक्त करत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे नावचा सिंह विधानसभेत आल्याचा आनंद व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील मतदारची अशी दुविधा मनस्थिती प्रथमच झाली असावी.

युतीच्या, मुख्यतः शिवसेनेच्या पराभवाची कारणे शोधायचंच झाल तर एक ना अनेक कारणे पुढे येतील. पहिलं म्हणजे मतदारांचा भावनिक द्रुष्टीकोन. मतदारांच्या मानसिकतेच विश्लेषण केलं तर असं समजतं भाजीपाला देखील पारखुन घेणारा भारतीय मतदार, उमेदवार निवडताना आजही कॉंग्रेसला फक्त गांधी घराण्याच्या नावावर मते देतो. तसेच बहुतांश मतदार हा अपरिपक्व आणि असमंजस आहे. पी.व्ही. नरसिंहराव यांनी जेव्हा भारतीय उद्योगक्षेत्र आणि अर्थव्यवस्थेत लाक्षणिक बदल घडवले तेव्ह्या त्यांना जनतेने पायउतार केले. चंद्राबाबु नायडुंच्या बाबतीत देखील आंध्रात असेच घडले. याउलट अटलजींनी जेव्हा 'मंदिर वही बनाएंगे' अशी घोषणा दिली, तेव्हा जनतेने त्यांना सत्तास्थानी नेउन बसवले. मात्र सत्तेत असताना भाजपाने जनविकासाचे असंख्य प्रकल्प राबवुनही, जनतेने त्यांना परतीची वाट दाखवली. शिवसेनेने यावेळी आपल्या प्रचारसभांतुन महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. उध्दव ठाकरेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजुन काढला. पण जनतेने आपला कौल पुन्हा आघाडीकडेच दर्शवला. पाणी-वीजटंचाई, आत्महत्या, महागाई या समस्या भोगुनसुद्धा जनतेने पुन्हा त्याच निष्कर्त्या सरकारला निवडुन दिले. थोडक्यात काय, तर ईथल्या मतदारांना विकासकामांशी कसलेही देणे घेणे नाही.

दुसरे कारण म्हणजे सगळी जनता आणि स्वतः शिवसेना ज्याला दोष देतायेत ती मनसे. फक्त साडेतीन वर्षात आपले अस्तित्व प्रस्थापित करुन भरघोस मताधिक्याने मनसेचे उमेदवार निवडुन आले खरे, पण मराठी मतांच विभाजन झाल्यानेच युतीचे महाराष्ट्रभर तीन 'तेरा' वाजले हे वादातीत सत्य आहे.

तिसरे आणि प्रमुख कारण म्हणजे स्वतः शिवसेना. हे वाचल्यावर "कोण रे तु घोंचु, साला कारणमीमांसा करणारा?" या आणि याहुनही शिवराळ भाषेत मला सेनेच्या प्रतिक्रिया मिळतील. ते खरदेखील आहे म्हणा, राजकीय पराभवाची कारणमीमांसा म्हणजे भारतीय हवामानखात्याच्या दर पावसागणिक 'अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा' हे कारण सांगण्याइतके सोपे नाही. पण जसा तुम्ही ४४ वर्षे मराठी जनांची सेवा केल्याचा हिशेब देता, तसा मी देखिल एका शिवसैनिकाच्या हक्काने (आजी असो की माजी) "तुम्ही कोण एका आमच्या भावनांना आवर घालणारे?" असा प्रतिप्रश्न करु शकतो.

शिवसेनेच्या इतिहासातील चढउतार बघता ही हार म्हणजे "युतीची दुर्गती" होते आहे हे स्पष्ट जाणवते. पण याची कारणमीमांसा करण्याची तसदी न घेताच सेना पराभवाचे खापर मराठी माणुस आणि तरुणवर्गावर फोडुन मोकळी झाली. आणि वर पुन्हा आम्ही अस बोललोच नव्हतो अस म्हणुन मोकळे. हा... काही अंशी हे खरही आहे, कारण सामनाचा संपादकीय लेख हा त्या रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांच्या खेळासारखा आहे. चेहरा एकाच अन बोलणारा दुसरा. पण हे लक्षात आल्यावरही "भावनेच्या भरात व मराठी जनांवरील आपल्या हक्कापोटी जे काही बोललो त्याबद्दल माफी मागत आहे", असं सांगितल असत तर आम्हा मराठी जनतेला तुमचा अभिमानच वाटला असता. अर्थात आपल्यासारख्या आदरणीय व्यक्तिची माफी कोणी स्विकारली असती म्हणा.

मान्य केले या निवडणुकीत उमेदवारीचे काही निर्णय चुकले, चुकीचे 'आदेश' दिले गेले. पण शिवसेना याच्या बऱ्याच आधी कुठेतरी चुकत होती. आजतागायत शिवसेनेत अनेक बलाढ्य नेत्यांची या न त्या कारणाने उलाढाल झाली आहे, काहींची तर हाकलपट्टीदेखील झालीये. खरं तर तेव्हाच धोक्याची घंटा ओळखायला हवी होती. कुठेतरी पाणी मुरतयं याचा अंदाज यायला हवा होता. सेना ही आता बलाढ्य लोकप्रतिनिधींचा 'लॉंच पॅड' ठरु लागली आहे. (ईथे बलाढ्य म्हणजे जास्तीत जास्त मतदारसंघ व आमदार ताब्यात असलेला नेता. पण असल्या पळकुट्या नेत्यांची लायकी तुम्ही-आम्ही जाणुनच आहात.) ईथुन लॉंच झालेले नेते पक्ष बदलुन दुसऱ्या पक्षात उडु लागली आहेत. पक्षांतर्गत तंटे उखडुन याला वेळीच आवर घातला नाही तर याचा अजुन जबर फटका सेनेला बसल्याशिवाय राहणार नाही. अर्थात परवाच सामना संपादकाने म्हंटल्याप्रमाणे सेना ही अस्वला सारखी आहे, १-२ केस गळाल्यानी तुम्हाला काही फरक पडत नाही. पण महाराष्ट्राला पडतो ना फरक. ज्या राज ठाकरेंवर आपण आपल्या पराभवाचा ठपका ठेवत आहात त्यांनी तर फक्त १३च जागा पटकावल्या आहेत. त्याआधीच्या पक्षाच्या गळालेल्या केसांनी तर सेनेला टक्कल पडायची नामुष्की आणलीये. आज जर तुम्ही राज ठाकरेंना दोषी धरत असाल तर २००४ साली कुठे होता हा पक्ष? तेव्हाही पड खाल्लीच ना? राजला दुय्यम वागणुक देवुन त्यांचा पत्ता तुम्ही कट केला खरे, पण आपल्या वारसाचा एक सरस दावेदार गमावुन बसलात. त्यात राजने आपली ताकत दाखवुन मीच खरा वारसदार हे सिद्ध केले तर त्यात वावगे काय आहे?

आज शिवसैनिक, जो मोर्चे काढतो, घोषणा देतो, लाठ्या खातो आणि प्रसंगी जेलमधेही जातो, तो भरकटलेल्या स्थितीत आहे. त्यांना नेता हा ठाकरेच हवा आहे, पण राज कि उद्धव? सेना कि मनसेना? असा संभ्रम त्याला सतावत आहे. अगदी मनोहर जोशी, बाळा नांदगावकरांपासुन ते सामान्य नागरीक अप्रत्यक्ष का होईना सेना-मनेसेना एकीची आशा धरुन आहेत. पण 'हु विल ब्लिंक फ़र्स्ट' असा खेळ चालु आहे.

पुराणात एक कथा आहे. भारत हे आपल्या देशाचे नाव ज्या राजावरुन पडले, त्या भरत राजाची ही गोष्ट आहे. आपल्या निव्रुत्तीच्या समयी भरत राजा आपल्या मातोश्री शकुंतलेकडे गेला आणि म्हणाला, "माते, माझ्या आठ पुत्रांपैकी केवळ 'माझा पुत्र' म्हणुन राजगादीवर बसवावा असा कोणीही लायक नाही. मला मार्ग दाखवं" शकुंतला माता म्हणाली, "राजा हा कुटुंबदक्ष असण्यापेक्षा प्रजादक्ष असला पाहिजे. जा राजसभा भरव आणि जनतेलाच आपला राजा निवडु दे."
सभा भरली. भरताने आपल्या आठही पुत्रांची परिक्षा घेतली होती त्यात एकही पात्र ठरला नाही असे भर सभेत जाहीर केले. मग जनतेने भरताच्या अष्टप्रधानांपैकी एकाचा मुलगा शंतनु याला आपला राजा म्हणुन निवडले. शेवटी भरतराजाचा अनुवंश गादीवर बसला नाही.

पुरानातील ही प्रथा आजच्या लोकशाहीतही तितकीच वैध आहे याची प्रचिती जनतेने निवडणुकांतुन दाखवुनच दिली आहे. राज कि उध्दव या प्रश्नाचे उत्तर वेळोवेळी निवडणुकांतुन मिळतच राहील पण अजुनही वेळ गेलेली नाहिये. कुणीतरी कुठेतरी समेळ घडवुन आणणे महाराष्ट्र हितासाठी आवश्यक आहे. नाहीतर पुढची विधानसभा निवडणुक होईल तेव्हा शिवसेना ४९ वर्षाची झाली असेल आणि सचिन तेंडुलकर सतरा वेळा नव्वदीत बाद झाल्याचं नाही वाटलं ईतक दुःख शिवसेना फिफ्टी न मारताच 'आउट' झाल्याचं वाटेल.

Monday, October 12, 2009

'राज'सभा

परवा शुक्रवारी दुपारी ऑफिसबाहेर मित्रांसोबत पॅसिव्ह स्मोक करत ऊभा होतो. शिवाजी पार्कला आलेले पोलीस छावणीचे रुप पाहुन एकाने मोठ्ठा कश मारत विचारले, "आज क्या पी.एम. की रॅली है क्या?" मी म्हंटल "नही रे.. आज राज ठाकरे आ रहा है. केरला से एक हजार पुलिस आयी है"
"लो.. आज फिर होगी बडे लोग बडी बाते" दुसरा कश.
"ना..ना..हि ईज डिफरंट मॅन, हि डोंट टॉक नॉनसेन्स" जास्त काही माहित नसताना मी ठासुन बोललो. पण अधिक (प्रांत) वादात न पडता त्याने विषय बदलला. त्याला राजचा अमराठी चा स्टॅंड आवडला नसावा असा अंदाज आला.
चुकिचं अस काहीच नव्हतं. प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते, अस माझ मत आहे. पण वाद न घालता विषय संपले की मला समोरच्याचा विजय झाल्यासारखं वाटतं. म्हणुन नेहमीच या विषयावर होणाऱ्या डिबेटसाठी सभेला जाउन तयारी करायच ठरवलं.

खरं तरं आजपर्यंत मी कधी कुठली प्रचारसभा बघितली नव्हती. लहानपणी प्रचार म्हणजे गल्लीतुन भोंगे लावुन फिरणाऱ्या गाड्यांतुन कमळ, पंजा, धनुष्य मिळते एवढच माहित होत. मग ते घेवुन खिशाला लावुन फिरण्यात खुप मोठेपणा वाटायचा. आज मात्र योग चांगलाच जुळुन आला होता. ऑफिस समोरच सभा असल्याने खास असं रस्ता वळवुन जाव लागणार नव्हतं. त्यात वीकएंड पण चालु झाला होता. शिवाय संध्याकाळी प्रोफेसर पांडेंचं रटाळ लेक्चर होत. हे प्रोफेसर कदाचित यु.पी.चे असणार. विचारलं तर सांगेन राज ठाकरेंच्या सभेला गेलो होतो, बघु काय म्हणतात ते.

सभा ७ वाजता आहे असं समजलं, पण मुद्दामच पुढे खुर्ची पकडायला जरा लवकर जाऊन बसलो. एकदम समोरचा ऍंगल मिळाला. अर्धा तास मस्त अभंग ऎकत गर्दिचं आणि स्टेजचं निरीक्षण करत बसलो. साडे सात वाजले तरी सर्व बाजुंनी गर्दीचे लोंढे धडकत होते. राज ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं होतं. मनसेचे पट्टेरी झेंडे सर्वत्र नाचत होते.

तितक्यात नाशिक ढोल च्या गजरात मनसेचे एक एक शिलेदार स्टेजवर येवु लागले. एक भारदस्त आवाज या सर्वांची ओळख करुन देत होता. यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपापले मतप्रदर्शन केले. आम्हाला आपले मत 'दान' न करता, कर्जाच्या रुपाने द्या असं अवाहन त्यांनी जनतेला केलं. तितक्यात 'राज साहेब आले..' असं सांगुन त्या भारदस्त आवाजाने पुन्हा माईकचा ताबा घेतला. राजं साहेबांच आगमन होताच.. 'ओ राजे..' या गीताने सगळ्या गर्दीला पुन्हा एक नवा जोश दिला. प्रत्येक जण आदराने आपापल्या जागी उठुन उभा राहिला. तितक्याच आवेशाने राज साहेबांनी पण हात उंचावुन सर्वांना अभिवादन केले. पुन्हा घोषणांना उधाण आलं.

मग हार-सत्कार वगैरे झाल्यावर राज ठाकरेंनी आपली 'राज'वाणी सुरु केली. त्यांनी जेव्हा गर्दिला 'अफ़ाट' असे संबोधले तेव्हा मी सहज मागे नजर वळवली. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी जागा मिळेल त्या ठिकाणी तोबा गर्दी केली होती. ही सगळी गर्दी खेचली होती फक्त एका व्यक्तीने त्याच्या विचाराने. सुरुवातीला त्यांनी प्रत्येक मराठी प्रसार माध्यमांचे (सगळ्या प्रचारसभांचे थेट प्रक्षेपण दाखवल्याबद्दल) आणि सुप्रीम कोर्टाचे (रेल्वे ईंजिन हे निवडणुक चिन्ह दिल्याबद्दल) आभार मानन्यात थोडा वेळ घातला. मग एक् दीर्घ पॉज् घेवुन 'आता ईंजिन स्टार्ट' असा डायलॉग मारला आणि सगळीकडे हश्या पिकला व टाळ्यांचा कडकडाट झाला.

मग त्यांनी जो दांडपट्टा सुरु केला तो तासभर चालुच होता. यातील मिनिटा-मिनिटाला मारलेल्या कोपरखळ्या त्यांच्या 'ठाकरी विनोदबुद्धी' ची प्रचिती देत होत्या. बोलताना कुठल्याही परिणामाची परवा नाही पण कुठलाही फालतुपणा नाही, बडेजावपणा नाही. नेतेमंडळींसारखा खादी कपड्याचा देखावा नाही. मोठी मोठी आश्वासने तर आजिबात नाही. मराठीच काय तर कुणालाही पटतील असे मंत्रमुग्ध करणारे विचार. खास करुन कुठलीही टिका बिनबुडाची नाही. समोर एका टेबलावर व्रुत्तपत्रांतील कात्रणे, मासिके आणि वार्षिक अहवाल यांसारखी पुरावे ठेवलेली. त्या दिवशी मला राज ठाकरेंचे विचार पटले म्हणण्यापेक्षा त्यांची शैली खुप भावली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. हे सगळं पहात आणि ऐकत असताना सरांनी आम्हाला वर्गात दाखवलेल्या मर्टिन ल्युथर किंगच्या 'आय हॅव अ ड्रिम' भाषणाची आठवण झाली. ध्यासवेडेपणा काय असतो हे कळले.

खर तर काही वर्षापुर्वी राज ठाकरे हि व्यक्ती फक्त ऐकुन होतो. तो बाळ ठाकरेंचा मुलगा कि पुतण्या हे देखिल ठावुक नव्हते. पण आज या व्यक्तिने आपले स्वतःचे एक अस्तित्व निर्माण केले आहे ते देखिल स्व-बळावर, फक्त साडे तीन वर्षात. ध्यास एकच महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषेला भौतिक आणि सांस्क्रुतिक वैभव प्राप्त करुन देणे.

राज साहेब, सांस्क्रुतिक सम्रुध्दीचे शिखर गाठुन जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र बनविण्यास आणि परप्रांतियांचे वर्चस्व नेस्तनाबुत करण्यास आपणास माझ्या हार्दिक शुभेच्छा.

ता.क. २२ तारखेला राजसाहेबांचे अभिनंदन करणारी एक पोस्ट नक्की टाकेन.

Friday, October 2, 2009

गारवा विडंबन


Tuesday, September 22, 2009

भारतमाता उवाच्

खालील पोस्टमधील पात्रे व घटना पूर्णत: काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत अथवा मृत व्यक्तिशी काहीही संबंध नाही. आढळल्यास तो योगायोग समजावा. धन्यवाद!

नमस्कार... खरं तर मी या लेखाला "मी भारतमाता बोलतेयं" असं शीर्षक देणार होते, पण कोणी काही बोलतय म्हणजे ती वायफ़ळ बडबड समजुन तिकडे दुर्लक्ष करण्याची तुमची खोड मी चांगलीच जाणुन आहे. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "मी नथुराम गोडसे बोलतोय" या बाबतीत नाही का असचं झालं. (अरे हो... "मी बाबुराव बोलतोय" हे पाचगळ गाणं तर मी विसरलेच. असो, विषयांतर नको..)

गेल्या महिन्यात १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्यदेवतेची मला स्पेशल व्हिजिट होती. तिच्या ६३व्या वाढदिवसा निमित्त माझ्यासारख्या जख्खड म्हातारीला घेऊन भारतभ्रमण करायची तिला लहर आली होती. मी म्हंटल बाई माझ्याच्याने काय हे होणार नाही, भारतभर हिंडण्यापेक्षा आपण एखाद्या शांत ठिकाणी जाऊया. स्वातंत्र्यदेवतेलादेखील हे पटलं. ती म्हणाली मग आपण पुण्यालाच जाऊया, सिनेमागृहात राष्ट्रगीत गाण्याची प्रथा म्हणे पुण्यातुनच सुरु झालीय.

ठरल्याप्रमाणे दोघी पहाटे लवकर उठुन तयार झालो. निघण्यापुर्वी स्वातंत्र्यदेवतेला तिच बर्थडे गिफ्ट दिलं.."काय आहे गं हे?", स्वातंत्र्यदेवतेनी विचारलं.
"अगं हे मास्क आहे, याला नाकवर चढवं, तिकडे म्हणे स्वाईन फ्ल्यु नं थैमान घातलयं."
"हे काय बाई नवीन?"
"अगं तु आत्ता नाकाला लाव ते तिकडे गेल्यावर सगळं समजेलच. यंदा गणपती बाप्पा पण म्हणे मास्क लावुनचं येणार आहेत."
"मग असं असेल तर आपण सरळ मुंबईला जाऊ."
"अगं तिकडेपण हेच चित्र आहे. आणि तिकडे आपली काय गरज? यंदा तिकडे बरीच खास मंडळी आहेत."
"कोण गं?"
"आणि कोण?...तो अजमल कासब आणि मुंबई बॉम्बस्फोटातले तीन अतिरेकी. हो सरकारी पाहुणेच आहेत ते. आपल्या लेकरांनी प्राणांची आहुती देवुन आणलयं ना त्यांना. तेव्हा 'हिन्दुस्थानी पाहुणचार' तर हवाच ना."
"हो न्यायदेवतेनं सगळं सांगितलयं मला. हे पण आता त्या अफजल गुरु सारखी वर्षानुवर्षे फाशीची वाट बघत आराम करणार."
"अगं बाई, बोलत काय बसलोय आपण. म.न.पा.ला झेंडावंदन अटेंड करायचयं ना ७.३० वाजताचं?"
"हो हो चल निघुया."

दरवर्षीप्रमाणे यंदाही तितक्याच ऊत्साहाने प्रत्येक सिग्नलला झेंडे विक्रेत्यांची झुंबड उडाली होती. रस्त्यात ठिकठिकाणी गाड्या, दुकानांवर् लावलेले छोटे मोठे झेंडे पाहुन स्वातंत्र्यदेवतेचं ह्र्दय गर्वाने फ़ुलुन आलं होत.
पुणे स्टेशनहुन जाताना एका ठिकाणी बरीच लांब रांग दिसली. स्वातंत्र्यदेवतेला म्हंटल "हे बघ हे डाय-डु हॉस्पिटल. इथे स्वाईन फ्ल्यु ची तपासणी होते. त्यासाठी ही गर्दी."
"हम्म्म् सरकारी हॉस्पिटल दिसतयं"
"अगदी बरोबर..प्रायव्हेट हॉस्पिटल्सला तपासणीची सुविधा नाहीये ना"
"असं का गं?"
"अगं, क्रृत्रीम टंचाई निर्माण करुन सरकारी म्हणजे मंत्र्यांची तिजोऱी भरायचा चान्स नेहमी नेहमी थोडाच येतो?

तितक्यात म.न.पा. आलं. "अगं हे काय? अजुन कुणीच कसं नाही?"
"अगं महापौर आहे हेचं खुप झालं. ईतक्या सकाळी सकाळी कोण उठणार? त्यात आज शनिवार. जोडुन सुट्टी आल्याने नोकरदार वर्ग जाम खुश आहे. यंदा पाऊस तसा कमीच आहे, पण कदाचित वर्षाविहार करायला लोणावळ्याला गेली असावीत. सॉफ्ट्वेअरच्या लोकांमधे मात्र शनिवारी स्वातंत्र्यदिन आल्याने 'लॉंग वीकऎंड' जस्ट मिस झाल्याचा नाराजीचा सुर आहे. खरं तर मी तुला शाळेतलंच झेंडावंदन दाखवलं असत, पण स्वाईन फ्ल्यु मुळे यंदा शाळा पण बंद आहेत."
"आणि हि नेते मंडळी कुठं दिसली नाहीत. आहेतं कुठं?"
" बघ ईथला सगळा कारभार भरामातीच्या गवारांच्या हातात आहे. ईथले पालकमंत्री पण तेच आहेत. तिकडच्या खासदार कुप्रियाताईंचा पण एकडे बऱ्यापैकी दबदबा आहे. क्रृषीमंत्री श्री.परत गवारांची क्रृपा आणि काय."
"आणि ते कुठे आहेत?"
"हम्म्म...दिवसेंदिवस त्यांचा चेंडुफळी संघटनेमधे रस वाढतो आहे...तेव्हा ते तिकडेच असतात."
"आणि खासदार साहेब?"
"ईथले खासदार टुरेश मलकाडी....हे बऱ्याचदा दौऱ्यावर असतात."
"अच्छा....कॉमन्वेल्थ गेम्स नंतर बरीच वेल्थ कमावलेली दिसते."
"हो पण आपण कोण बोलणारे? हे सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत ईथले..'लहरी राजा अन् प्रजा आंधळी' अशी गत आहे बघ.."

आता आम्ही मोर्चा गावात वळवला. दुपारच्या वेळी सुध्दा आज रस्त्यावर रहदारी नव्हती. "ही सारी जनता काय स्वाईन फ्ल्यु च्या भितीने घरात दडुन बसलीये कि काय्?" स्वातंत्र्यदेवतेनी विचारलं.
नाही गं आजं रेडिओ आणि टी.व्ही.वर सगळ्या वाहिन्यांचे देशप्रेम ऊफाळुन आलयं. कुठे "आजादी का जशन्" तर् कुठे "मजे की आजादी" नावाखाली दिवसभर बॉर्डर, भगत सिंग, एल.ओ.सी, तिरंगा, क्रांतीवीर असे चित्रपट चालु असणार...संध्याकाळी हॉटेलात बघ कशी गर्दी होते ते."
"बिचाऱ्यान्ना तास तास वेटिंग मधे ऊभं रहाव लागतं म्हणे?"
"हो ना...मंदिरासारखा स्पेशल पास नाही मिळत ना ईथे"
"हो..त्याशिवाय सुट्टी कशी साजरी होणार यांची"

हळु हळु स्वातंत्र्यदेवतेच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत चालले होते...
"खरचं ईतकी मग्न झालीये का गं आपली लोकं आपापल्या आयुष्यात की त्यांना देशाबद्दल कुठल्याही गोष्टीत स्वारस्य नाही उरलयं. ईतकी हताश-हतबल. संपला का तो लढाऊ बाणा, ते सळसळत रक्त?"
"आजिबात नाही. रोज व्रृत्तपत्रातल्या भ्रष्टाचार, दहशतवाद आणि सामाजिक गुन्ह्यांच्या बातम्या वाचुन घराघरात चीड निर्माण होते, ठिणगी पेटते. दुर्दैवाने दैनंदिन व्यापात ती ठिणगी घरातच विझुन जाते. सामजिक गुन्हेगारी, भ्रष्ट राजनिती यांसारख्या व्रृत्तींचा नायनाट व्हायला उशीर आहे फक्त ही ठिणगी घराबाहेर पडण्याचा."
"पण या सगळ्या ठिणग्या एकत्र येवुन वणवा पेटणार तरी कधी?"
"त्यासाठी जनतेला वेळ हवा ना... महागाई, क्रृत्रीम टुटवडा, रहदारी, गर्दी, नोकरी यांसारख्या अनेक प्रश्नांनी त्यांना जखडुन ठेवलय. आठवड्यातुन एकच दिवस कुटुंबासाठी वेळ मिळतो तर समाजासाठी कुठुन वेळ काढणार? बिचारा बॉम्बस्फोट झाले तरी सकाळी ८.२० च्या ट्रेन ला हजर राहतो. आज वाचलो म्हणून दुसर्‍या दिवशी पुन्हा संध्याकाळी सुखरूप घरी येण्याची आशा धरून "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणून घराबाहेर पडतो. स्वतः चौकट न मोडता समाजात रंग दे बसंती, स्वदेस, वेन्सडे आणि डोंबिवली फास्ट सारखे नायक जन्मावे अशी अपेक्षा करतो."

एव्हाना आश्रुंनी स्वातंत्र्यदेवतेला दुःख द्यायचे नाही या माझ्या स्वताःच्याच निश्चयाला आता तडा गेला होता...स्वातंत्र्यदेवतेच्या देखील डोळ्यात अश्रु तरळले होते…

काहितरी चमत्कार होईल असा दिलासा मी तिला देत होते...पण नियतीपुढे मात्र दोघींचेही चालले नाही. आपल्या 'अभासी' अस्तित्वाचा शेवट जवळ आल्याची जाणीव तिलाही झाली होती. माझ्या पाठीवर शेवटचा हात फिरवुन, म्हटलं तर आपल्या, म्हटलं तर परक्या देशाकडुन खाली मान घालुन तिने पाठ फिरवली होती. आता कधी कुठे भेटणार हे जरी माहित नसलं तरी "लवकरच भेटु" असे विनंतीवजा आशावादी शब्द नकळत माझ्या तोंडातुन पडले.

रस्त्यावर कचरागत पडलेल्या त्या झेंड्यांकडे पहात स्वातंत्र्यदेवतेने मात्र परतीचा मार्ग धरला होता...कदाचित पुन्हा परत न येण्यासाठीच...

"पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका" अशी स्वातंत्र्यदेवतेची विनवणी लिहिण्याची वेळ कुसुमाग्रजांवर का आली असावी, याची आता मला जाणीव झाली होती…

वैतागवाडी

आत्तापर्यंत मी या ब्लॉगवरुन त्या ब्लॉगवर माकड-उड्या मारत बऱ्याच पोस्ट "पहिली पोस्ट" म्हणुन लिहिल्या आहेत, त्यामुळे इथे पहिली पोस्ट लिहिण्याचा उत्साह केव्हाच मावळला आहे.

सकाळपासुन माझ्या जुन्या ब्लॉगवर मराठी पोस्ट टाकण्यासाठी बरेच हातपाय मारल्यानंतर शेवटी कंटाळुन नविन ब्लॉग सुरु करत आहे.

तुर्तास डोके ठिकाणावर नसल्याने जास्त न बोलता नविन पोस्ट टाकत आहे. स्विकार असावा.

कळावे,
सचिन अ.जोशी

ता.क.
आणि हो सांगायचचं राहिलं 'गरमा-गरम" नाव का दिल ते... एकदम शाळकरी मुलाच्या "कारणे द्या" स्टाईलमधे कारणे देत आहे...
१. खर तर दुसरं काही नाव सुचत नव्हतं.
२. सकाळपासुन ढग आलेले असल्याने आज हवामान खुपच उष्ण होते. ऑफिसला पोहोचेपर्यंत घामाने चिंब भिजलो होतो.
३. त्यात कधी नव्हे ते ऑफिसमधे A.C.दिवसभर बंद होते. अजुन गरमी.
४. तीन दिवसाचा लॉंग वीकएंड घरी जाऊन आल्याने पाणी बदलमुळे (कि स्वाईन फ्ल्युमुळे?) सर्दी आणि अंग पण गरम होते.
५. त्या रेडिफ ब्लॉगने सकाळपासुन डोकं अजुनचं गरम केल होतं.